मुंबईतील राजकारण तापलं! आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंसाठी का केली प्रार्थना?
Mumbai Politics : मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होईल? हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. मुंबईत पाऊस पडल्याने गारवा आला असला, तरी राजकारण मात्र तापलं आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरले आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना लक्ष्य करण्याची संधी साधली. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बाण डागले. यावेळी आदित्य ठाकरेंनी त्यांची सत्ता असताना केलेल्या कामाची उदाहरणंही दिली. आदित्य ठाकरेंनी केलेल्या दाव्यावर बोट ठेवत भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये शेलारांनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढला आहे.
आशिष शेलार विरुद्ध आदित्य ठाकरे, ट्विटमध्ये काय?
भाजपचे नेते शेलारांनी केलेल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरेंचा एक व्हिडीओ आहे. यात आदित्य ठाकरे म्हणत आहे की, ‘आमच्यावेळी 300 मिमी पाऊस होवो अथवा 400 मिमी. हे तासाला होतं. त्यावेळी मी किंवा महापौर वा उद्धव ठाकरे स्वतः रस्त्यावर जायचे. लोकांशी बोलायचे. काही गैरप्रकार असेल, असुविधा असेल, तर ती सोडवण्याचे प्रयत्न करायचे. काही अडचण असेल, तर ती सोडवण्याचे प्रयत्न करायचो.’
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांनी ‘गद्दारी’वरून डिवचले, शरद पवारांनी काढला सगळा इतिहास
आदित्य ठाकरेंच्या याच विधानावरून आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात. उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली.’
मुंबईची आकडेवारी सांगताहेत की चेरापुंजीची? शेलारांचा ठाकरेंना सवाल
‘म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 mm पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात 400 mm? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत 26 जुलै 2005 ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता’, असं टीकास्त्र शेलारांनी ठाकरेंवर डागलं आहे.
हेही वाचा >> ‘नातवाने शेण खाल्ले तरी…”, संजय राऊतांनी शंभूराज देसाईंना डिवचलं
तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात…
उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत.
काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली…म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 mm पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी… pic.twitter.com/TsxDnDfMag
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 26, 2023
‘यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर! मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना. ‘इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन, वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी!’, असा उपरोधिक टोला आदित्य ठाकरेंना शेलारांनी लगावला आहे.